मुंबई : ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आरपीआय) ६१वा वर्धापनदिन तीन ऑक्टोबरला ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या वेळी ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,’ असे आवाहन ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष तीन ऑक्टोबर १९५७ रोजी स्थापन करण्यात आला. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाविरुद्ध देशातील प्रबळ व्यापक विरोधी पक्ष म्हणू सर्व समावेशक रिपब्लिकन पक्ष उभारण्याची डॉ. आंबेडकर यांची संकल्पना होती. त्यानुसार सर्व जातीधार्मियांचा पक्ष म्हणून सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्ष साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे. यंदा ‘आरपीआय’चा ६१वा वर्धापनदिन असून, हा सोहळा ठाण्यातील हायलँड मैदानात होणार आहे,’ अशी माहिती आठवले यांनी दिली.
‘या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले भूषवणार असून, या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार कपिल पाटील, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी दिली.